लघू व मध्यम उद्योग अर्थात ‘एसएमई’मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, यावर एक नजर... ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’च्या आजच्या भागात... ....
भारताच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये लघू आणि मध्यम उद्योगधंदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते भारतीय उत्पादन क्षेत्राचा कणा मानले जातात. जगातील पुरवठा साखळी (सप्लाय चेन) चालू ठेवण्यासाठी लहान उत्पादक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या क्षेत्रात ‘आयओटी’चा वापर मात्र कमी आहे.
लघू-मध्यम आकाराच्या उद्योगांना ‘आयओटी’चा फायदा होऊ शकेल. ‘आयओटी’ केवळ मोठ्या उद्योगधंद्यांसाठीच आहे किंवा ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी मोठे भांडवल आहे, त्यांनीच केले पाहिजे असे काही नाही. ‘आयओटी’मधून अनेक मार्गांनी छोट्या व्यवसायांना फायदा होऊ शकतो.
छोट्या कंपन्यांमध्ये ‘आयओटी’साठीचे कौशल्य विकसित करणे, ही कठीण गोष्ट आहे. या उद्योगांकडे इतर मोठ्या उद्योगांसारखे आर्थिक किंवा मनुष्यबळाचे पर्याय नसतात. त्यामुळे या कंपन्यांना या संदर्भातील अनेक गोष्टींची माहिती नसते.
इंटरनेट ऑफ थिंग्ज लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये पुढील प्रकारे मदत करू शकते :
ग्राहकांचे समाधान : जेव्हा ग्राहकांना उत्पादनाविषयी सहज माहिती मिळू शकते, त्याच्या गुणवतेची खात्री पटते, तेव्हा ओघानेच उद्योगधंद्यांचा फायदा होतो. ‘आयओटी’मध्ये वापरल्या गेलेल्या सेन्सर्समुळे हे खूपच सोपे होते.
आर्थिक वाढ : आपण शक्य तितक्या लवकर ‘आयओटी’चा अवलंब केल्यास आपल्याकडे इतरांपेक्षा चांगल्या प्रकारचे उत्पादन लवकर उपलब्ध होऊ शकते. परिणामी आर्थिक वाढ दिसते.
ओम्नी-चॅनेल व्यवसाय मॉडेल स्वीकारण्यासाठी मदत : उद्योग प्रक्रिया ही अखंड आणि एकीकृत असल्याचा अनुभव प्रत्येक ग्राहकाला मिळण्यासाठी जे तंत्र आत्मसात केले जाते, त्याला ओम्नी-चॅनेल व्यवसाय मॉडेल असे म्हटले जाते. ‘आयओटी’ मुळे आपोआपच वेगवेगळ्या व्यवस्था एकमेकांशी संवाद साधून ही गोष्ट सहज शक्य होते. याचा फायदा ग्राहकांबरोबरच संचालकालासुद्धा होणार आहे
नियम आणि मानकांचे पालन : ‘आयओटी’तील सेन्सर्स आणि त्यामुळे मिळणारी माहिती यामुळे कंपन्यांना नियम आणि मानकांच्या पालनासाठी मदत होते. याचबरोबर कार्यक्षमता वाढविण्यामध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची मदत होते.
योग्य विश्लेषण आणि व्यवसायाविषयीची सखोल माहिती मिळण्यासाठी ‘आयओटी’चा मोठा उपयोग होऊ शकतो.
लघू आणि मध्यम उद्योगधंद्यांनी ‘आयओटी’ क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हे करायला हवे.
- ‘हे माझ्यासाठी नाही’ असा दृष्टिकोन बदलायला हवा.
- सध्याच्या तंत्रज्ञानाबद्दलची जागरूकता वाढवायला हवी.
- एखाद्या गोष्टीच्या अंमलबजावणीच्या सर्वोत्तम पद्धतींचे ज्ञान करून घ्यायला हवे.
- सध्याची उत्पादने आणि नव्याने येणारी उत्पादने याचा एकंदरीत कल पाहायला हवा
- नवीन तंत्रज्ञान हाताळण्याविषयीचा विचार
- अंमलबजावणी करण्यासाठी भागीदाराची निवड
- हे तंत्रज्ञान का आवश्यक आहे, याबाबतच्या विचाराची स्पष्टता.
- कोणत्या समस्या आहेत याची जाणीव हवी
लघू आणि मध्यम उद्योगधंदे ‘आयओटी’चा वापर कसा सुरू करू शकतात, याची माहिती कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कंपनीतल्या अगदी छोट्या पदावरच्या व्यक्तीलाही पाहिजे. दोन जणांची का होईना, एक टीम तयार केली पाहिजे, जी केवळ ‘आयओटी’विषयीची माहिती करून घेईल, त्याविषयी जागृती करील. कंपनीतील विविध समस्या, आव्हाने यांचा विचार करून, कशाला प्राधान्य द्यायचे हे ठरवू शकेल. ‘आयओटी’ची सुरुवात कुठून करायची आहे, हे ठरले, की आपोआपच ‘आयओटी’नंतर काय अपेक्षित आहे हे कळणे सोपे जाते. यातून कमी गुंतवणुकीमध्ये चांगले परिणाम दिसू शकतात.
‘एसएमई’साठी ‘आयओटी’ सोल्यूशन देणाऱ्या किंबहुना खास त्यांच्यासाठी ‘आयओटी’ सोल्यूशन देणाऱ्या भागीदारांची गरज आहे. एखादी गोष्ट सोपी, पटकन होणारी असेल तर ‘एसएमई’ला त्यामध्ये जास्त कुतूहल असते. खरे तर त्वरित निर्णय घेणे, एखादी गोष्ट तातडीने घडून येण्यासाठीचा वेग, ती गोष्ट छोट्या प्रमाणात करायची असल्याने प्रत्येक कामात असलेला सुटसुटीतपणा याचा निश्चितच फायदा होतो.
पुरवठा साखळीत लघू आणि मध्यम उद्योगधंद्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे त्यांना विविध प्रकारची सुलभ ‘आयओटी’ सोल्यूशन्स तयार करून देणे आवश्यक आहे. या उद्योगांना सगळ्यात जास्त गरज असते ती नियंत्रण प्रणालीची, ज्याचा उपयोग एकादी समस्या लवकर ओळखण्यासाठी, योग्य तिथे खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी, एखाद्या तंत्रज्ञानच्या वापरामुळे वेगवेगळे फायदे मिळवण्यासाठी होऊ शकेल, हे पाहिले गेले पाहिजे.
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे इंटरनेट आणि ज्या प्रकारे आपण आपल्या जीवनाकडे पाहत आहोत त्या दृष्टिकोनात क्रांती घडून येत आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला अधिक चांगली उत्पादने तयार करण्यास मदत होईल आणि ती उत्पादने आधुनिक, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर असतील. कंपन्यांसाठी हा बदल स्पर्धात्मक राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. या तंत्राचा पुरेपूर वापर करणाऱ्या कंपन्याच भविष्यात इतरांपेक्षा अधिक सामर्थ्यवान असतील.
- अनुष्का शेंबेकर